
श्रीगोंदा : ऊसतोड वाहतूक करणाऱ्या मजुरांनी आपली भावी पिढी सज्ञान, सक्षम व सदृढ घडवण्यासाठी बालकांकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीय मुजीब शेख यांनी केले. श्रीगोंदा तालुका विधी समिती, वकील संघ व सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी कारखाना कार्यस्थळावर ऊसतोड मजूर महिलाकरिता हळदी- कुंकू व साडी वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ऊसतोड मजुरांचे जीवन हे अतिशय खडतर असते. महिला -भगिनींना स्वतःच्या अरोग्याकडे, मुला -बाळांकडे लक्ष देण्यासाठी फार कमी वेळ मिळतो. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची व मुला -बाळांची आबाळ होते. त्याचे दुष्परिणाम म्हणून शारीरिक व्याधी निर्माण होतात. मुलांना योग्य शिक्षण व संस्कार न मिळाल्यामुळे त्यांची दिशा भरकटते व ते चुकीचे मार्गाने जातात. याकरिता महिलांनी आपल्या कुटुंबाबरोबर आरोग्य व मुला-मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन त्यांना चांगले संस्कार देण्यासाठी प्रयत्नशील असावे, असे ते म्हणाले. वरिष्ठ स्तर दिवाणी न्या. सी.व्ही. शिरसाठ यांनी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करत असताना कौटुंबिक, शारिरीक व मानसिक हिंचाराची सविस्तर माहिती देऊन त्यातून बाहेर पडण्याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे म्हणाल्या, की साखर कारखानदारीमध्ये ऊस मजुरांचे योगदान हे लाख मोलाचे आहे. त्यांना पाच ते सहा महिने स्वतःचे गाव व घर सोडून बाहेर जावे लागते, त्यामुळे कुटुंबियाचा दूरावा दूर करून त्यांना मायेचा ओलावा मिळावा, याकरिता विधी समितीने पुढाकार घेऊन आयोजित केलेला कार्यक्रम अतिशय स्तुत्य व प्रेरणादायी आहे. या कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश वरिष्ठ स्तर डी. पी. शिंगाडे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ एस.पी. केकाण , दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ एच. जे. पठाण, वकील संघाचे अध्यक्ष ऍड. अशोकराव वाळुंज, ऍड. विश्वास नागवडे, ऍड. झुंबरराव गायकवाड, कामगार व ऊसतोड मजूर, मुकादम महिला उपस्थित होत्या. यावेळी सुमारे ३०० महिलांना साडी वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. जयंत शिंदे यांनी केले. प्रास्ताविक ऍड. सुनील भोस यांनी केले. आभार कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे यांनी मानले.
