
श्रीगोंदा : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राद्वारे श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास सन २०२४-२५ करता करिअर कट्टा अंतर्गत राज्यस्तरीय तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. छत्रपती महाविद्यालयास उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक, डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांना उत्कृष्ट प्राचार्य प्रवर्तक आणि प्रा. विलास सुद्रिक यांना उत्कृष्ट जिल्हा समन्वयक म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहेत. राजेंद्र नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची उत्तम प्रगती सुरू आहे. ‘नॅक’मध्ये मिळविलेले ए प्लस मानांकन आणि पुरस्कारांची हॅट्रिक होणे त्याचे द्योतक आहे. छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी शुभेच्छा देत, प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या कष्टातून श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय ‘NAAC -A’ उत्तम प्रावीण्य मिळवत आहेत. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकासाला प्राधान्य दिले जाते. परिणामी उच्चतम निकाल व आधुनिक तंत्रज्ञानचा वापर यामुळे महाविद्यालय नावारूपाला आले असल्याची प्रतिक्रिया दिली. प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांचे व्यवस्थापन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने २०२४ या वर्षात ७० विद्यार्थ्यांची पोलीस, वनरक्षक व इतर सरकारी नोकरीमध्ये तसेच कॅम्पस मुलाखतीद्वारे बँक व इंडस्ट्रीमध्ये १४१ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली. अनेक विद्यार्थी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रातून अध्यापन करत आहेत, तसेच प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या सर्वांची दखल घेत हे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या यशाबद्दल शिक्षक व शिक्षकेतर वृंदांचे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, जिल्हा बँक संचालिका अनुराधा नागवडे, निरीक्षक सचिन लगड, सर्व विश्वस्थ यांनी अभिनंदन केले.
